Tuesday, 22 June 2021

पत्रापत्री

पत्रापत्रीमधल्या भावना  
-----------------------------
कोणे एकेकाळी आम्ही फुलस्केप्स भरभरून पत्रं लिहायचो त्याचा विषय निघाला! खरंच काय मझा असायचा इंटरनेट नसणाऱ्या त्या काळांत! हाताने पत्रं लिहायची मित्रमैत्रिणींना ..क्वचित इनलँडवर पण बहुतेकवेळा फुलस्केप्सवर लिहून, एन्व्हलपमध्ये भरून सील करून ठराविक स्टॅम्प्स चिकटवून जवळच्या पोस्टऑफिसच्या लाल पत्र्याच्या बॉक्समध्ये टाकायची आणि मग ती पोहोचून, मित्रमैत्रिणींकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघायची!!!....खूप  आनंदी दिवस होते ते!! त्या इंटरनेट आणि ओघानंच फेसबुक नसण्याच्या युगात पेनफ्रेंड नावाचा प्रकार होता.  अनेक मासिकांमधून, साप्ताहिकांमधून खास चौकटी/ स्तंभ असायचे आणि मग त्याजरीये आपण देशविदेशातले मित्रमैत्रिणी मिळवून नंतर त्यांच्याशी त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून पत्रव्यवहार करू  शकत असू. मग त्यांतून पुस्तकं, स्टॅंप्स, माहितीची देवाण घेवाण होत असे! अशी जमलेली मॆत्रीसुद्धा वर्षानुवर्षं टिकत असे! काहींची तर त्यातूनच आंतरखंडीय लग्नसुद्धा जमायची!... आणि त्या पत्रापत्रीतनं पोस्ट खात्याला चांगलंच उत्पन्न मिळत असे!... आता ते सर्वच इतिहासजमा झालंय ...

काळानुरुप अनेक गोष्टी आउटडेटेड ठरतात आणि ठरत गेल्यात हे जरी अपरिहार्य असलं तरी दोन मनांमधला दुवा सांधणारं पत्र, एकाने हाताने लिहून पोस्ट केल्यावर दुसऱ्याला ते मिळून ते उघडून वाचण्यातून मिळणारा मझा काही औरच होता! आता हे जे इलेक्ट्रॉनिक पत्रापत्री (मेसेजामेसेजी!!) चालते त्यात कितीजण स्वतःच्या उत्कट आणि तरल भावना नेमक्या पोहोचवू शकतात? आणि मग आधीच पूर्णतः स्वतःच्या बुद्धीच्या क्षमतेचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करण्याची दुर्बुद्धी बळावलेल्या आजकालच्या काळात, आयते उपलब्ध असणारे इमोटीकॉन्स आणि इमोजींची मदत घेऊन काम चालवून नेलं जातं.

सहज म्हणून धांडोळा घेतला तर समजलं की अशा प्रकारे चिहनांचा वापर करणं जवळपास १६० वर्षांपूर्वी म्हणजे १८५७ ला सुरु झालं होतं. म्हणजे जेव्हा भारतात १८५७चं बंड होत होतं तेव्हा तिकडे युरोप अमेरिकेत मोर्स कोड वापरून संदेश पाठवणाऱ्यांसाठी द नॅशनल टेलिग्राफिक रिव्ह्यू अँड ऑपरेटर्स गाईडने "73" हा मोर्स कोड "लव्ह अँड किसेस"ची खूण म्हणून वापरायला सुरुवात केली होती. पुढे डॉजने काढलेल्या मॅन्युअल मध्ये त्यासाठी "88" हा नंबर दिला होता. 

त्यानंतर १९१२ साली एंब्रोस बिअर्सने ‿ हे चिह्न हास्य म्हणून वापरायला सुरुवात केली तीच बहुदा पहिली स्माईली!! त्यानंतर मॅड मॅगेझीनने काही अशाच चिह्नाची एक लिस्ट १९६२च्या अंकात टाईपरायटून्स (Typewri-toons) म्हणून दिली आणि लोकांनी ते वापरायला सुरुवात केली. पण आज आपल्याला जागोजागी दिसणारा पिवळ्या गोलातला हसरा चेहरा स्माईली हा मात्र १९६३ साली हार्वे बॉल या फ्रिलान्स आर्टिस्टने जगाला दिला. आणि तो कित्ती प्रचंड लोकप्रिय झाला ते आपण बघतोच बघतोच! पुढे १९७२ साली इलिनॉय युनिव्हर्सिटीने काही इमोटीकॉंन्स त्यांच्या PLATO IV कॉम्प्युटरमधून वापरयाला सुरुवात केली. स्कॉट फामनने तर इमोटीकॉन्सच्या क्षेत्रात क्रांतीच केली होती. पुढे १९९६ साली निकलस लुफ्रानीने 'द स्माईली' कंपनीच स्थापन केली आणि शेकडो स्माईली जगासमोर आणले. पाठोपाठ जपानच्या शिगेताका कुरीताने अफलातून ईमोजींची निर्मिती केली. आणि नंतरच्या काळात कॅट मोमोई, मार्क डेव्हिस, यासुओ किडा आणि पीटर इडबर्गच्या योदाननामुळे हे सर्व इमोटीकॉन्स आणि इमोजींनी आपलं आयुष्य ओसंडून वाहिलेलं पाहतोय!

विचार केला तर यातला फोलपणा जाणवतो. केवळ वेळ वाचावा म्हणून भावना शब्दबद्ध करणं टाळून हे इमोटीकॉन्स आणि इमोजीज वापरले जातायत अगदी फेसबुक, व्हॉट्सऍप सगळीकडे सकाळी उठल्यापासून मध्यरात्री झोपेपर्यंत!!... पण त्यात खरंच आपली सर्व भावना पोचू शकतात? तंतोतंत?? 

ज्ञात माहितीनुसार, एकमेकाला आपल्या भावना कळण्याचा मानवाचा प्रवास इसवी सनापूर्वी ५०० वर्षांपूर्वी पर्शियाच्या राणी ऍटोस्सापासून सुरु झाला खरा; पण आज २०१८ साली आपल्या भावना आपल्याच शब्दांत मांडणारी पत्रं पाठवणं सोडून आपण खुशाल कॉम्युटर/मोबाईलने समोर आणलेल्या चिन्हनांचा आधार घेत सुटलोय. मान्य की एकीकडे जग जवळ येत असताना माणूस माणसाला समोर भेटणं टाळतोय आणि त्यामुळे वपुंनी फार सुंदर शब्दांत मांडलेलय सत्याला ("डोळे आणि स्पर्श हे शब्दांपेक्षा सुंदर बोलतात") आपण पारखे होत चाललोय...

मला स्वतःला फोनवर संवाद साधणं तितकंसं जमत नाही. मला 'तो' किंवा 'ती' समोर हवे असतात, त्याच्या/तिच्या भावना, रेसिप्रोकेशन, म्हणणं समोर बोलून त्यांच्या चेहऱ्यावर उमटून जे कळतं ते फोनवर नाहीच कळू शकत ...आणि माणूस समोर नसेल तर निरुपायाने आपल्या भावना/ म्हणणं हे पत्र लिहूनच कळवावं लागतं आणि या आधुनिक काळात पत्र लिहिणंही मागे पडून मोबाईलवर लिहायची वेळ आल्ये. 

गेले ते रम्य दिवस...आता त्या मित्रमैत्रिणींनाही तितकं मोठं पत्र लिहायला वेळ नसणार.....शेवटी कितीही म्हटलं तरी 'संवाद' समोरासमोर बसून होतो तोच खरा! नै? 😉

1 comment:

  1. त्यामुळे शब्दांमध्ये व्यक्त होणे एकदमच कमी झालंय. बुद्धीला गंज चढू लागला.calaculator ने बेरजा वजाबाक्या तोंडी करण्याचे दिवस संपले. तसेच हे आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अपंगत्व वाढले.

    ReplyDelete